लोणी काळभोर: हवेली तालुक्याचे वैभव असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची 99.27 एकर जमीन विक्रीला आज राज्य मंत्रीमंडळाने परवानगी दिली आहे. जमीन विक्री करण्यासंदर्भातील मोठा अडथळा दूर झाल्याने कारखाना सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे हवेली तालुक्यातील शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज मंगळवारी (ता.26) राज्य मंत्रीमंडळांची साप्ताहिक बैठक पार पडली. या बैठकीत यशवंत सहकारी साखर कारखान्याला जमीन विक्रीस परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते.

आर्थिक अनियमितेमुळे तोट्याच्या गर्तेत सापडलेला “यशवंत” कारखाना हा मागील चौदा वर्षापासुन बंद असुन, कारखान्यासमोरील आर्थिक आव्हानं खूप मोठी आहेत. “यशवंत” कारखाना मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या ताब्यात असून कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकारची फार मोठी मदत लागणार आहे. सरकारच्या मदतीशिवाय कारखाना सुरू होण्याची अजिबात शक्यता नाही.
यशवंत कारखान्यावरील बँकाची कर्जे, शेतकऱ्यांची थकीत ऊसबीलं, कामगारांचे थकीत पगार, शासनाची विविध देणी, व्यापारी देणी व इतर देय देणी देण्यासाठी तसेच कारखान्याचा गाळप हंगाम सुरु करण्यासाठी कारखान्याला भरीव निधीची गरज आहे. हा लागणारा निधी उपलब्ध करण्यासाठी जमीन विक्री करण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी एकमताने घेतला होता. त्या नंतर राज्य सहकारी बँकेकडे तारण असलेल्या कारखान्याच्या मालकीच्या जमीनीपैकी 99.27 एकर जमिनीची विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीला करण्याबाबतचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आला होता.
त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखाना यांच्या संचालक मंडळाच्या संयुक्त बैठकीत 99.27 एकर जमीन 299 कोटी रुपयांना विक्री करण्याच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या जमीन विक्रीच्या निर्णयाला आज राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. त्यामुळे यशवंत कारखाना सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल बोलताना कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले की, मंत्रिमंडळाने कारखान्याच्या मालकीची जमीन विक्रीस परवानगी दिल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांचेही आम्ही सर्व खूप खूप आभारी आहोत. वरील तिघांनीही कारखाना चालू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच कारखान्याचे सभासद, शेतकरी व कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. कारखान्याच्या हितासाठी आमच्या पाठीमागे उभे असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. सध्या मुंबईत असल्याने जास्त बोलत नाही. पुण्यात आल्यानंतर मी व संचालक मंडळ याबद्दल सविस्तर भूमिका मांडणार आहे.







