भिगवण, ता.11: इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त यात्रा कमिटीची विशेष सभा बोलवण्यात आली होती. तहसीलदार जीवन बनसोडे अध्यक्षस्थानी तर धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक प्रज्ञा कांबळे सचिव म्हणून उपस्थित होत्या. सभा पार पडली या सभेमध्ये काही विषय आले आणि याच विषयाला अनुसरून सभा पार पडल्यानंतर तहसीलदार सभेतून उठून दुसऱ्या दालनात गेल्यानंतर भिगवण पोलिसांच्या समोरच ग्रामस्थांनी राडा घातला. या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण पाहायला मिळाले. आता याप्रकरणी भिगवण पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सभेत अनेक मागण्या, प्रश्न मांडले गेले, सभा सुरळीत पार पडत होती. मात्र शेवटी वातावरण तापलं. ग्रामस्थांमध्ये वाद झाला आणि पाहता पाहता उपस्थित ग्रामस्थ एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत एकमेकांवर धावून गेले. विशेष म्हणजे भिगवन पोलिसांसमोरच हा राडा झाला.पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगवला.
यासंदर्भात इंदापूर ते तहसीलदार जीवन बनसुडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, भिगवन गावची यात्रा आहे. या यात्रे संदर्भात श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट भिगवण अशी एक पूर्वीची ट्रस्ट असून या ट्रस्टमधील सर्व ट्रस्टी हे मयत आहेत. त्यामुळे 2023 साली शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षक यासोबतच स्थानिक पोलीस यांच्या सदस्यत्वाखाली एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती धार्मिक उत्सव पार पाडत असते आणि त्याच अनुषंगाने माझ्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा आयोजित केली होती.
सभेदरम्यान यात्रेकरीता जी लोकवर्गणी जमा होईल त्यातील 40 टक्के रक्कम ही यात्रेकरीता खर्च करावी आणि उर्वरित 60 टक्के रक्कम इतर कामांसाठी खर्च करावी असे विविध मुद्दे पुढे आले. तर काहींनी याला विरोध दर्शवला. यात्रेसाठी जमा होणारी लोक वर्गणी ही यात्रेकरिताच खर्च झाली पाहिजे असाही मुद्दा मांडला गेला. यावर चर्चा मसलत होऊन सभा पार पडली. मात्र सभा पार पडल्यानंतर मी दुसऱ्या दालनात गेलो होतो आणि त्यानंतर पाठीमागे ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला.
ज्यांच्यावर नागरिकांनी हल्ला केला ते बाबा धवडे आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, भिगवणमध्ये काही राजकीय व्यक्तींनी स्वतःच्या स्वार्थापोटी लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम चालू केले असून माझ्यावरती करण्यात आलेला हल्ला हा त्यातलाच एक प्रकार आहे. समाजाच्या हितासाठी बोलणे हा गुन्हा असून समाज उपयोगी कार्यक्रम राबवावे हा माझा प्रामाणिक व ठळक असा मुद्दा होता. परंतु काही व्यक्तींना हा न पटल्यामुळे त्यांनी हल्ला केला त्याचा जाहीर निषेध करत असून त्यांना लोकशाही मार्गाने उत्तर दिले जाईल.