पुणे: मुंबईनंतर आता पुण्यातील वाहतूक (Amol Kolhe) ही मोठी (Pune News) समस्या बनत चालली आहे. विशेषतः सणासुदीच्या दिवसांत शहरात प्रचंड गर्दी निर्माण होते. दोन ते तीन तास वाहनधारकांना कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे महत्त्वाच्या सरकारी किंवा खासगी कामासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल होतात. या समस्येवर उपाययोजना न झाल्याने अखेर चाकणकर रस्त्यावर उतरले आणि पीएमआरडीए (PMRDA) कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
चाकणमधील ग्रामस्थ आणि एमआयडीसीचे कर्मचारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. सकाळी 6 वाजता पाहणी दौरा केलेल्या आणि प्रशासनाच्या कागदी घोड्यांवर विश्वास दाखवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आंदोलकांनी रोष व्यक्त केला.

या मोर्चादरम्यान पीएमआरडीए कार्यालयाबाहेर खासदार अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही कोल्हेंच्या पाठीशी उभे होते. आंदोलकांनी “गुरुवारी वाहतूक कोंडी नसते, व्हीआयपी मूव्हमेंटसाठी मार्ग खुले होतात, मग एरवी पोलीस काय करतात?” असा थेट सवाल केला. आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी हद्दपार होत आहे, मात्र सरकार आणि प्रशासनाला याची पर्वा नाही, अशी खंतही एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
मोर्चादरम्यान अमोल कोल्हे यांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेशाची मागणी केली. मात्र पोलिसांनी ती मागणी फेटाळली. त्यामुळे कोल्हे आक्रमक झाले. “आम्ही शांततेत मोर्चा आणला आहे. आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, नाहीतर प्रशासनाला खाली बोलवा,” असे ते पोलिसांना भिडले. अखेर मोर्चेकरांचा आग्रह मान्य करून खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व शिष्टमंडळाला पीएमआरडीए कार्यालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी इतर मोर्चेकरांना मात्र बाहेरच थांबवण्यात आले.
या आंदोलनामुळे चाकणमधील वाहतूक कोंडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांनी दिला आहे.







