बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा आपल्या (Bramati News) विशिष्ट शैलीत तुफान फटकेबाजी करत स्पष्ट इशारे दिले आहेत. बारामती शहरातील सावतामाळी सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी विकासकामांच्या आड येणाऱ्या आणि चोरी करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. “कुठं हार्ट काढत बसून नका, आता मी कॅमेरे बसवणार आहे. कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो,” असा स्पष्ट इशारा अजित पवारांनी दिला.

या कार्यक्रमात त्यांनी बारामतीतील वाढता विकास, लोकसंख्या आणि काही नागरिकांच्या वर्तणुकीबद्दल थेट भाष्य केले. “मी विकास करतोय आणि काही लोक तिथं चोऱ्या करण्याचा प्रयत्न करतात. कुणाचं नुकसान झालं की म्हणतात, बघा कसा विकास चाललाय! बोलायला कुणी हात धरू शकत नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी नागरिकांना सावध करत सांगितले की, “जो चोरी पकडून देईल त्याला 1 लाख रुपये बक्षीस देऊ आणि जो चोरी करेल त्याला 2 लाखांचा दंड ठोको. पकडणाऱ्याला 1 लाख आणि 1 लाख रुपये पालिकेला देऊ.”

अजित पवार पुढे म्हणाले, “मी काम करताना जात बघत नाही. काम करण्यासाठी वाळू आणली, पण काहींनी तीच वाळू चोरून नेली. ही जित्राबं बारामतीत कशी आली? यांचा बंदोबस्त करतो.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रशासन विकासासाठी काम करत असताना काहीजण त्यात अडथळे आणतात आणि अशा लोकांना आता शिक्षा होणारच आहे.

बारामतीतील नागरिकांच्या सवयींवरही त्यांनी विनोदी शैलीत टीका केली. “काही जण नवरात्री आली की गोधड्या धुतात आणि मी जिथं सुशोभित केलं आहे, तिथं वाळायला टाकतात. दसऱ्याच्या दिवशी बारामतीत 2300 चारचाकी गाड्या विकल्या गेल्या. साहेब आमदार होते, तेव्हा 17 हजार मतदार होते. आता मतदार 1 लाख 10 हजार झाले आहेत. एवढी लोकसंख्या वाढलीय,” असे त्यांनी सांगितले.
याचवेळी त्यांनी काही नेत्यांनाही टोले लगावले. “रस्त्यावर सतरंजी टाकतात आणि विकायला बसू नका. एक बाई अंडी विकायला बसली, लहान मुलांच्या खेळण्यावर मोठी लोक बसतात. तुझं खेळण्याचं वय गेलं आता, तू आता घोडा झालाय,” असा मिश्कील टोला त्यांनी लगावला. पुढे शरद पवार गटातील दोन महिलांचा संदर्भ देत ते म्हणाले, “काहींना मी नगराध्यक्ष केलं, पण ते आज माझ्या सोबत नाहीत.”
शेवटी अजित पवार म्हणाले, “आता पाच दिवस सुट्टी आहे. मला कागद द्यायचं बंद करा. माझी आणि कागदाची कुठं गाठ पडली! निवडणूक संपली की आचारसंहिता लागेल, त्यामुळे मला राज्यभर फिरावं लागेल.” त्यांच्या भाषणाने सभागृहात अनेकदा टाळ्यांचा कडकडाट झाला, तर त्यांच्या मिश्कील शैलीने वातावरण रंगून गेले.







