मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांबरोबरच राज्यसभेच्या निवडणुकीकडेही लक्ष वेधले जात आहे. एप्रिल महिन्यात सात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपणार असून, त्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावे, अशी मागणी राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. (Sanjay Raut on Sharad Pawar)

संजय राऊत काय म्हणाले?
दरम्यान, शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण विधान केले. राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या जागांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये काही जागा रिक्त होत असून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा एकत्रित विचार करता केवळ एकच उमेदवार निवडून जाऊ शकतो. तिन्ही पक्षांचे काही सदस्य निवृत्त होत असल्याने या संदर्भात सर्व पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना राऊत म्हणाले की, त्यांनी अलीकडेच पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्या वेळी पवार यांनी पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्द्यावर महाविकास आघाडीत चर्चा सुरू असून पवार यांनी आपली भूमिका काँग्रेसलाही कळवली आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.
60 वर्षांहून अधिक संसदीय अनुभव असलेल्या शरद पवार यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे राज्यसभेच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील चर्चेनंतर पुढील रणनीती निश्चित होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.







