मुंबई : सोलापूर व अक्कलकोट येथील कन्नड भाषिकांनी कर्नाटकात सामील व्हावे, असे ट्विट करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी खळबळ उडवून दिली होती. अनेक लोकप्रतिनिधींनी यावर उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बेळगाव, कारवार आणि निपाणी आम्हाला देणार असाल तर जतच्या गावांशी चर्चा करू, अशी प्रतिक्रिया देताना बोम्मई यांच्या ट्विटची हवाच काढून घेतली.
गेल्या दोन दिवसापासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली होती. मात्र, आजच्या ट्विटला तेथ शरद पवार यांनी उत्तर देताना थेट कर्नाटक सरकारलाच आव्हान दिले. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बीदर महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी गेली अनेक वर्ष लढा सुरु आहे. या लढ्यात महाराष्ट्राचं सातत्य राहिलं आहे. मी काल बोम्मईंचं जतबाबत विधान ऐकले . जर कर्नाटक सरकार बेळगाव, कारवार, निपाणी हा सगळा परिसर आपल्याला सोडायला तयार असतील तर त्यांना काय काय देता येईल, यावर चर्चा करणं शक्य होईल, अशी प्रतिक्रिया पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
या सगळ्या प्रकारावर भारतीय जनता पक्षाने देखील आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन पवार यांच्याकडून करण्यात आले आहे.
राज्यातील एकही गाव बाहेर जाणार नाही : मुख्यमंत्री शिंदे
सांगलीच्या जत तालुक्यातील जी ४० गावे कर्नाटकात जाणार म्हणतात, ती जुनी मागणी आहे. आता परिस्थिती बदलली आहे. सीमाभागातील गावांत राज्य सरकारने अनेक योजना आणि सवलती लागू केल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी अगर कोणत्याही कारणाने राज्यातील एकही गाव बाहेर जाणार नाही. आमच्या सरकारची ती जबाबदारी आहे,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिर्डीत बोलताना दिली.