नेपाळ : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे रस्ते, पूल, इमारती आणि अनेक वस्त्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 781 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

या महापुराचा फटका नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशूली भागातील कृषी विकास बँकेच्या शाखेलाही बसला. पुराचे पाणी आणि चिखल बँकेच्या संपूर्ण परिसरात शिरल्याने तेथील लॉकर आणि इतर भागांपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्यानंतर बँकेत ठेवलेली मौल्यवान संपत्ती बाहेर काढण्यासाठी विशेष बचाव मोहीम राबवण्यात आली.

पोलिस आणि बचाव पथकाने जवळपास 8 तास अथक प्रयत्न करून बँकेतील मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे बाहेर काढल्या. या कारवाईत अंदाजे 50 कोटी नेपाळी रुपये किमतीचे सोने सापडले. याशिवाय सुमारे दीड कोटी नेपाळी रुपये रोख, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूही सुरक्षित करण्यात आल्या. बँकेची महत्त्वाची कागदपत्रेही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली.

भोटेकोशी नदीच्या पुरामुळे अनेक भागांमध्ये चिखल आणि पाणी साचले होते. त्यामुळे मदतकार्य करणाऱ्या पथकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत बँकेतील कोट्यवधींची संपत्ती सुरक्षित बाहेर काढणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते.
दरम्यान, नेपाळ सरकारकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 9435 नागरिकांना हवाई आणि रस्ते मार्गाने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मदतकार्यासाठी 394 उड्डाणे करण्यात आली आहेत.
नेपाळी लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाचे 20618 जवान बचावकार्यात तैनात आहेत. भारत, चीन आणि दक्षिण कोरियातील तज्ज्ञ पथकेही नेपाळच्या मदतकार्यात सहभागी झाली आहेत. भारतीय पथकाने रसुवा भागात सुमारे 3 किलोमीटरच्या बोगद्यात जाऊन शोधमोहीमही राबवली आहे.







