पुणे: सध्या राज्याच्या हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. कोकण किनारपट्टीपर्यंत धडक दिलेल्या मान्सूनचा प्रवास काहीसा थंडावला असून, पावसाच्या ढगांनी अचानक काढता पाय घेतल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. मान्सून 15 ते 20 जूनच्या सुमारास सक्रिय होईल, असा हवामान खात्याचा अंदाज असला तरी, सध्या पावसाची कोणतीही ठोस लक्षणे दिसत नाहीत. उलट, उन्हाचा चटका कायम असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट अद्याप शमलेली नाही. मुंबईसह उपनगरांमध्ये दमट वातावरणाने आणि उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. पावसाचा खंड पडण्यामागे प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव हे मुख्य कारण मानले जात आहे. एल निनोच्या सक्रियतेमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वारे मंदावले आहेत, ज्याचा थेट परिणाम मान्सूनच्या गतीवर झाला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, 20 जूननंतर पावसाची शक्यता आहे, परंतु मान्सून संपूर्णपणे स्थिरावण्यासाठी जुलै महिन्याचा पहिला किंवा दुसरा आठवडा उजाडू शकतो. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये या काळात हलक्या सरींची अपेक्षा आहे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचे आगमन होऊ शकते, मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सध्या कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, लवकरच एल निनोचा प्रभाव कमी होऊन पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. या स्थितीमुळे ऑगस्ट महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, ऑगस्टमध्येही पाऊस न झाल्यास 3 जुलैनंतर चांगला पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.






