Pension Scheme : मुंबई : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक नागरिकांना स्थिर नोकरी नसल्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश कामगारांना भविष्यासाठी आर्थिक आधार देणे हा आहे.

या योजनेअंतर्गत 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये निश्चित पेन्शन दिले जाते. या योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या वयानुसार दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. 18 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेमुळे कमी उत्पन्न असलेल्या कामगारांना भविष्यासाठी सुरक्षितता मिळते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठरवण्यात आल्या आहेत. अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे आणि त्यांचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच अर्जदार हा EPFO किंवा ESIC योजनेचा सदस्य नसावा. या अटी पूर्ण करणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये रिक्षाचालक, पथविक्रेते, घरगुती कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार, मेकॅनिक, कचरा वेचणारे आणि इतर लघु कामगारांचा समावेश होतो.
अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक आणि ऑटो-डेबिटसाठी संमतीपत्र आवश्यक असते. इच्छुक नागरिक जवळच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन नोंदणी करू शकतात. तसेच LIC, EPFO किंवा ESIC कार्यालयांमार्फतही अर्ज करता येतो.
ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी भविष्यातील सुरक्षिततेची चांगली संधी मानली जात आहे. कमी रक्कम जमा करून नियमित पेन्शन मिळवण्याचा हा सोपा मार्ग असल्याने अनेक नागरिक या योजनेकडे आकर्षित होत आहेत.







