Israel Iran War : पुणे: मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता जगभरात उमटू लागले असून, याचे थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि व्यापारावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी पहाटे इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर संयुक्त हवाई हल्ले केले, ज्याला इराणनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. या दोन्ही देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये तणाव पसरला असून, भारतासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. (Israel Iran War)

भारत आणि इराण यांच्यातील व्यापारी संबंध जुने आहेत. सध्या भारताचा इराणसोबत सुमारे एक अब्ज ६८ कोटी डॉलरचा व्यापार सुरू आहे. जर हा संघर्ष दीर्घकाळ चालला, तर या व्यापारात मोठी घट होऊ शकते. भारत इराणला प्रामुख्याने बासमती तांदूळ, चहा, साखर, फळे, मांस आणि औषधे निर्यात करतो. याशिवाय औद्योगिक यंत्रसामग्री, वाहनांचे सुटे भाग आणि कापूस देखील मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. युद्धामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्यास भारतीय निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तसेच, इराणकडून भारतात येणारे सफरचंद, पिस्ता, खजूर आणि विविध खनिजांचा पुरवठा खंडित झाल्यास देशांतर्गत बाजारात महागाई वाढण्याची शक्यता आहे.
या संघर्षाचा सर्वात मोठा फटका भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीला बसू शकतो. भारताचे सुमारे ४० ते ५० टक्के कच्चे तेल होरमुझच्या सामुद्रधुनीमार्गे येते. हा मार्ग जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. युद्धाच्या परिस्थितीमुळे हा मार्ग असुरक्षित झाल्यास तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात, ज्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होईल. तसेच, इराणमधील चाबहार बंदर प्रकल्प, जो भारतासाठी मध्य आशियाचे प्रवेशद्वार आहे, त्यावरही या युद्धाचे सावट आहे. जहाजांचे विमा हप्ते आणि भाडे ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्यास व्यापाराचा खर्च प्रचंड वाढणार आहे.
अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे आधीच भारत आणि इराणमधील व्यापार १७ अब्ज डॉलरवरून खूपच खाली आला आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतपणे लष्करी मोहीम जाहीर केल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आहे. भारताने नेहमीच या दोन्ही बाजूंमध्ये संतुलित भूमिका घेतली असली, तरी जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विस्कळीत झालेली पुरवठा साखळी यामुळे भारतासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. येणाऱ्या काळात हा संघर्ष शांत झाला नाही, तर महागाईचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





