पुणे: पुणे आणि मुंबई प्रवास आता ‘हाय-स्पीड’ (High Speed Rail) गतीने होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सात नवीन अतिजलदरेल्वे प्रकल्पांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या दोन मार्गांचा समावेश करण्यात आला आहे.

देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे यश आणि त्यातून मिळालेला तांत्रिक अनुभव लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता देशाच्या इतर भागांत हाय-स्पीड ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या या सात नवीन कॉरिडॉरमध्ये पुण्याला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
सध्या पुणे-मुंबई प्रवासाला रेल्वेने 3 ते 4 तास लागतात. हाय-स्पीड ट्रेनमुळे हे अंतर अवघ्या 90 मिनिटांच्या आत कापले जाण्याची शक्यता आहे. विमानाचा प्रवास, तिथली सुरक्षा तपासणी आणि विमानतळावर जाण्याचा वेळ पाहता, शहराच्या मध्यवर्ती भागातून सुटणारी हाय-स्पीड ट्रेन हा अधिक सोयीस्कर आणि स्वस्त पर्याय ठरेल.
हैदराबाद ते बंगळुरू, चेन्नई ते बंगळुरू आणि वाराणसी ते सिलीगुडी यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांमुळे पुण्याहून दक्षिण आणि उत्तर भारतात जाणे अधिक सोपे होणार आहे.







