Crime News : लातूर : जळकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका शेतकऱ्याने हातावर काही जणांची नावे लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 6 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत शेतकरी काही दिवसांपासून पत्नीच्या विनयभंगाच्या तक्रारीसाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारी रोजी एका संशयिताने तिच्याशी गैरवर्तन केले होते. यानंतर पतीने जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही तक्रार नोंदवली जात नव्हती. यामुळे ते मानसिक तणावाखाली होते.

पीडित महिलेने असा आरोप केला आहे की, तक्रार नोंदवण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच संबंधित आरोपींकडून तक्रार मागे घेण्यासाठी सतत धमक्या दिल्या जात होत्या. या दबावामुळे शेतकरी पूर्णपणे खचले होते.
6 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता त्यांनी विष प्राशन करून आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या हातावर काही आरोपींची नावे लिहिली होती. तसेच एक चिठ्ठीही त्यांनी जवळ ठेवल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तुळशीदास केंद्रे, गणेश केंद्रे, शिवाजी केंद्रे यांच्यासह इतर नातेवाईक आणि दोन पोलीस कर्मचारी अशा एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून, प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकारी करत आहेत.







