पुणे: सन 2026 ची होळी ही केवळ रंगांचा उत्सव नसून ती खगोल प्रेमींसाठी अत्यंत दुर्मीळ पर्वणी ठरणार आहे. यावर्षी 2 मार्च रोजी ‘होलिका दहन’ होत असतानाच, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला ‘ग्रस्तोदित चंद्रग्रहण’ (Chandra Grahan) लागणार आहे. एकाच वेळी होळी, धूलिवंदन आणि ग्रहण असा त्रिवेणी योग जुळून आल्याने पंचांगकर्ते आणि ज्योतिषाचार्यांनी काही विशेष नियमावली जाहीर केली आहे.

‘दाते पंचांग’ानुसार, सोमवारी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात होलिका दहन करणे शास्त्रशुद्ध ठरेल. मात्र, खरा पेच मंगळवारी आहे. या दिवशी दुपारी 3:20 वाजल्यापासूनच ग्रहण सुरू होणार आहेत. संध्याकाळी 6:48 वाजता ग्रहण समाप्त होईल.
अनेकांच्या मनात शंका आहे की ग्रहणामुळे धूलिवंदन रद्द होणार का? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. वेधकाळात रंग खेळण्यास कोणतीही मनाई नाही. मात्र, ‘भोजन’ निषिद्ध मानले गेले आहे. मंगळवारी सूर्योदयापासून वेध पाळणे हिताचे आहे. वेधकाळात पूजेचा नैवेद्य दाखवता येईल, पण अन्न ग्रहण करणे टाळावे. संध्याकाळी 6:48 नंतर स्नान करूनच भोजन करावे.
ग्रहणाच्या काळात वातावरणातील नकारात्मक ऊर्जेपासून अन्नाचे रक्षण करण्यासाठी ‘तुळशीपत्राचा’ वापर महत्त्वाचा ठरतो. शिजवलेले अन्न, पिण्याचे पाणी, दूध आणि दह्याच्या भांड्यात एक तुळशीपत्र टाकून ठेवावे.






