नवी दिल्ली: समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी UCC बाबत केलेल्या विधानानंतर या विषयावर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. बिहारमध्ये सत्तेत असलेल्या NDA आघाडीतही या मुद्द्यावर वेगवेगळी मते समोर येत असल्याचे दिसून येत आहे.

जनता दल युनायटेडचे नेते श्याम रजक यांनी बिहारमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, बिहारमध्ये कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू केला जाणार नाही. त्यामुळे NDA मधील घटक पक्षांमध्ये UCC च्या मुद्द्यावर मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, भाजपचे मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताची सामाजिक रचना अनेक परंपरा, संस्कृती आणि समुदायांनी तयार झाली आहे. त्यामुळे समानता राखताना देशातील विविधतेचाही विचार करणे गरजेचे आहे.

चिराग पासवान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमधून सांगितले की, देशातील वेगवेगळ्या समाजघटकांच्या स्वतःच्या प्रथा आणि परंपरा आहेत. संविधानानेही देशातील या विविधतेला काही विशेष तरतुदींमधून मान्यता दिली आहे.
त्यांनी अनुसूचित जमातींसाठी असलेल्या घटनात्मक तरतुदींचाही उल्लेख केला. पाचवी आणि सहावी अनुसूची तसेच अनुच्छेद 371-A आणि 371-G यांसारख्या तरतुदींचा दाखला देत त्यांनी विविधतेचे संरक्षण महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
लोक जनशक्ती पक्ष समानता आणि विविधता या दोन्ही मूल्यांच्या बाजूने असल्याचे चिराग पासवान यांनी म्हटले. तसेच UCC चा मसुदा सार्वजनिक करण्यात यावा, त्यावर सर्व संबंधित घटकांशी चर्चा व्हावी आणि व्यापक सल्लामसलत केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे UCC च्या मुद्द्यावर बिहारमधील NDA घटकपक्षांची भूमिका आगामी काळात महत्त्वाची ठरणार आहे.







