बिहार : भारतीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election) तारखा जाहीर केल्या असून, राज्यात दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होणार असून, निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येतील.
निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल समोर आला असून यानुसार, विरोधकांना या निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. Matrize-IANS ने जाहीर केलेल्या सर्वेनुसार, बिहारमधील जनतेकडून एनडीएला पसंती मिळत असल्याचं दिसून आलं आहे.

सर्व्हेनुसार एनडीएला तब्बल 150 ते 160 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर विरोधकांना केवळ 70 ते 80 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. तर इतर पक्ष आणि अपक्षांना केवळ 9 ते 12 जागांवर यश मिळू शकते.
या सर्वेनुसार, एनडीएला 49 टक्के तर इंडिया आघाडीला 36 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. दरम्यान, हा सर्व्हे बिहारमधील लोकांशी चर्चा करून तयार करण्यात आला असून, यामध्ये 243 मतदारसंघातील 46 हजार 862 लोकांशी चर्चा करण्यात आली आहे.
दरम्यान, हा सर्वे अहवाल समोर आल्यानंतर या निवडणुकीत एनडीए बाजी मारू शकते असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे. मात्र, आता येत्या 14 नोव्हेंबरलाच जनतेने कोणाच्या पारड्यात भरभरून मतं टाकली आहेत हे समोर येईल.







