ढाका: बांगलादेशातून मोठी बातमी समोर आलोई आहे. येथे आगामी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशातील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. येथील तरुण नेते आणि निवडणूक उमेदवार शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर राजधानी ढाकासह अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने (Bangladesh Violence) उसळली असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

संतप्त जमावाकडून प्रसारमाध्यमांचे कार्यालय लक्ष्य
राजधानी ढाकामध्ये संतप्त जमावाने देशातील प्रमुख प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांना लक्ष्य केले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. आंदोलकांनी देशातील आघाडीची वृत्तपत्रे ‘डेली स्टार’ आणि ‘प्रोथोम आलो’ यांच्या कार्यालयांवर हल्ले करत आत प्रवेश केला आणि मालमत्तेचे नुकसान केले. आगीच्या घटनेदरम्यान सुमारे 25 ते 30 पत्रकार इमारतीत अडकले होते, त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
शरीफ उस्मान हादी यांची गोळी झाडून हत्या
शरीफ उस्मान हादी हे ‘इन्कलाब मंच’ या संघटनेचे प्रवक्ते होते आणि ते आगामी सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. शुक्रवारी ढाकामध्ये प्रचार सुरू असताना मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारांसाठी सिंगापूरला हलवण्यात आले. सहा दिवस लाइफ सपोर्टवर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.
ढाकासह अनेक शहरांमध्ये संतापाची लाट
हादी यांच्या मृत्यूची बातमी पसरताच ढाकासह अनेक शहरांमध्ये संतापाची लाट उसळली. आंदोलकांनी हादी यांच्या नावाने घोषणाबाजी करत त्यांच्या हत्येस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत तणाव कायम होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. मात्र, हिंसाचाराबाबत पोलिसांकडून तत्काळ कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
येत्या 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार
सध्या बांगलादेशात अंतरिम सरकार कार्यरत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात आल्या होत्या. त्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आले. देशात येत्या 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
दरम्यान, राष्ट्राला संबोधित करताना मुहम्मद युनूस यांनी हादी यांच्या मृत्यूला बांगलादेशच्या राजकारणासाठी आणि लोकशाहीसाठी कधीही न भरून येणारे नुकसान असल्याचे म्हटले. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.







