उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे एका 75 वर्षीय व्यक्तीचा लग्नाच्या रात्रीच गूढरित्या मृत्यू झाल्याने खळबळ (Viral News) उडाली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूमागचे खरे कारण आता उघड झाले आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? सविस्तर जाणून घेऊया…

जौनपूरमधील कुछमुछ गावातील रहिवासी असलेले संगरू राम (वय 75) यांनी सोमवारी मनभावती (वय 35) नावाच्या महिलेशी लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर त्याच रात्री संगरू राम यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे कुटुंबात आणि परिसरात मोठा धक्का बसला.

यानंतर कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आज या पोस्टमॉर्टमचा अहवाल समोर आला असून, मृत्यूचे खरे कारण उघड झाले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, संगरू राम यांच्या मृत्यूचे कारण ‘शॉक/कोमा’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरं लग्न करण्यामागचे कारण काय?
संगरू राम यांच्या पत्नीचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते आणि त्यांना अपत्य नव्हते. एकटेपणामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नासाठी त्यांनी आपली जमीन 5 लाख रुपयांना विकली होती. तर त्यांची नवरी मनभावती यांचेही हे दुसरे लग्न होते आणि त्यांना आधीच तीन मुले आहेत.
मनभावती यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी त्यांची तयारी नव्हती, परंतु लग्न जमवणाऱ्या व्यक्तीने त्यांना आश्वासन दिले होते की, संगरू राम त्यांच्या मुलांची काळजी घेईल. मात्र, लग्नाच्या रात्रीच संगरू राम यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांमध्ये शंका निर्माण झाली होती.







