मुंबई: राज्यातील 29 महापालिकांच्या (Udhhav Thackeray) निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव (Mumbai Mahapalika Election) ठाकरे यांनी निकालांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईसह राज्यातील (Mumbai BMC Election Result) अनेक महापालिकांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नसलं, तरी शिवशक्तीला मिळालेल्या मतांबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानत निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. (Latest Marathi News)
निवडणूक प्रचारादरम्यान सर्व महापालिकांमध्ये स्वतः उपस्थित राहू न शकल्याची कबुली देत उद्धव ठाकरे म्हणाले, “चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत, परभणीमध्येही आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात शिवशक्तीला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराचा मी मनापासून आभारी आहे.”

मात्र, या निवडणुका अत्यंत घाणेरड्या पद्धतीने लढवल्या गेल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “साम-दाम-दंड-भेद वापरून ही निवडणूक लढवण्यात आली. मुंबईमध्ये आमचा महापौर व्हावा ही इच्छा होती आणि आजही आहे. पण आम्ही बहुमताचा आकडा गाठू शकलो नाही. तरीही आमच्या यशाने अनेकांच्या कपाळावर घाम फुटला,” असं म्हणत त्यांनी निकालाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला.
शिवाजी पार्कवरील सभांच्या तुलनेवरूनही ठाकरे यांनी विरोधकांवर टोले लगावले. “आमच्या सभेला शिवाजी पार्क फुलून गेलं, पण त्यांच्या सभेला गर्दी नव्हती. मग आमच्या सभेला गर्दी होते पण मतं मिळत नाहीत, आणि त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांनी मतदान केलं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांनी म्हटलं की, “आमचे अर्धे नगरसेवक गळाला लावले गेले, पण आता ते गाळात गेले आहेत. भाजप कागदावर आहे, जमिनीवर नाही. आमचे निवडून आलेले नगरसेवक साधे आहेत, सामान्य लोकांमधले आहेत.”
मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवरही त्यांनी टीका करत सांगितलं की, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तिजोरी कशी रिकामी झाली याचा जाब मुंबईकरांच्या वतीने विचारतील. “देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल, मेवाची नाही,” असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. या निवडणुकांमधून शिवसेनेची ताकद कमी झाली असली, तरी पक्ष संपलेला नाही, हा संदेश देण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो.







