मुंबई : मुंबई ते नागपूर या ७०० किमी मार्गादरम्यानचा प्रवास अवघ्या ८ तासांत करण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, तरीही लोकार्पणाचा मुहूर्त अजूनही ठरलेला नाही. पुढील आठवड्यात लोकार्पण होण्याची शक्यता असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मात्र निश्चित तारीख स्पष्ट केलेली नाही.
मार्च महिन्यात या मार्गाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांकडून यापूर्वी सांगण्यात आले होते. १०० दिवसांच्या कृती आराखडयाची कामे आणि विविध कामांच्या लोकार्पणाचा लगबग यामुळे मुंबई ते नागपूर सुसाट प्रवासाचे स्वप्न लांबवणीवर पडले आहे. आमणे ते वडपे दरम्यानच्या ४ किमी मार्गावरील कामही शेवटच्या टप्प्यात आले असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे नागपूर आणि शिर्डी दरम्यानच्या ५२० किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, तर शिर्डी आणि भरवीर दरम्यानच्या मार्गाचे उद्घाटन मे २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.