मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती निवळली असली तरी मुंबई पोलिसांनी शहरात खबरदारी म्हणून एक प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, मुंबईत फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरात कोणत्याही कार्यक्रमात फटाके फोडता येणार नाही.
मुंबई पोलिसांच्या डीसीपी ऑपरेशन्सनी महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.पोलिसांनी 11 मे ते 9 जून या कालावधीत बृहन्मुंबईच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीने फटाके वाजवु नये किंवा चिडीसह कोणतही रॉकेट उडवु नये असे म्हटले आहे.हा निर्णय पूर्णपणे खबरदारी म्हणून घेण्यात आला आहे, जेणेकरून शहरात कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा अफवा पसरू नये. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले, “फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे लोक गोंधळून जाऊ शकतात आणि त्याचा संबंध कोणत्याही धोक्याशी जोडू शकतात. अशा परिस्थितीत जनतेमध्ये भीती किंवा तणाव पसरण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील शांतता व्यवस्थेला बाधा पोहोचू शकते.
दरम्यान फटक्यांवरील ही बंदी हा एक सुरक्षात्मक उपाय आहे आणि याचा उद्देश शहरातील शांतता कायम राखणे हा आहे. विशेषतः जिथे गर्दी आणि अफवा जलद पसरण्याची शक्यता असते अशा संवेदनशील भागांमध्ये हा उपाय अत्यंत आवश्यक होता, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे