मुंबई: राज्यात सध्या महापालिका निवडणुकांमुळे (Mumbai News) आचारसंहिता लागू असून निवडणूक आयोगाकडून विविध ठिकाणी भरारी पथके तैनात (Mumbai Election) करण्यात आली आहेत. मुंबईसह इतर (Mumbai Crime) महानगरांमध्ये ही पथके संशयित वाहनांची कसून तपासणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पैशांचा वापर करून किंवा आमिष दाखवून उमेदवारी मागे घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे निवडणूक काळात बेकायदेशीर पैशांची देवाणघेवाण होऊ नये यासाठी निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे. (Latest Marathi News)

अशातच मुंबईतील देवनार परिसरात भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान दोन व्हॅनमधून तब्बल 2 कोटी 33 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती तातडीने आयकर विभागाला देण्यात आली असून आता या पैशांबाबतचा तपास आयकर विभाग करत आहे. सध्या जप्त करण्यात आलेली रक्कम देवनार पोलिसांकडे कस्टडी म्हणून ठेवण्यात आली आहे. ही रक्कम नेमकी कुठून आणली होती आणि कुठे नेली जात होती, याची सविस्तर चौकशी सुरू आहे.
दरम्यान, देवनार पोलिसांनी या घटनेची नोंद स्टेशन डायरीमध्ये केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. आयकर विभाग या पैशांचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत असून तपासानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.







