मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेपरफुटीचे रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. परीक्षेत सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास संशय निर्माण होऊ शकतो, या भीतीने उमेदवार ऋतुजा पाटीलला तब्बल दहा प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवण्याचा सल्ला देण्यात आला होता. यासंदर्भातील व्हॉट्सॲप चॅट्स पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे.

तपासात आरोपींकडून तब्बल २९४ प्रश्नांची यादी तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ७७ प्रश्न परीक्षेत अगदी त्याच स्वरूपात आले होते. या प्रश्नांसोबत अपेक्षित गुणांची नोंदही करण्यात आली होती. त्यामुळे परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळाल्याचा संशय अधिक बळावला आहे. उमेदवाराने सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊ नयेत, यासाठी करण्यात आलेल्या सूचनांमुळे पेपरफुटीचा प्रकार किती काळजीपूर्वक आखण्यात आला होता, हेही समोर आले आहे.

या प्रकरणात ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या प्रेमसंबंधामुळे पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती आहे. तपासानुसार, ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी परीक्षेच्या दोन दिवस आधी दलाल प्रवीण पाटीलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका मिळवल्याचा आरोप आहे. त्यानंतर ऋतुजाने ही प्रश्नपत्रिका प्रेमापोटी गौरव पाटीललाही दिल्याचे तपासात समोर आले आहे.

परीक्षेनंतर ऋतुजा उत्तीर्ण होऊन औषध निरीक्षक पदासाठी पात्र ठरली. मात्र, पुढे ऋतुजा आणि गौरव यांच्यात वाद होऊन दोघांचे संबंध तुटले. त्यानंतर गौरवने एमपीएससीकडे ऋतुजाविरोधात तक्रार केली. काही काळाने त्याने पुन्हा आयोगाला ई-मेल करून आपण मुद्दाम पेपरफुटीचा बनाव केल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्या भूमिकेबाबतही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. गौरवला पोलिसांनी अटक केली असून ऋतुजाला नोटीस बजावण्यात आली आहे. तिच्यावर अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही.
दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यात एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांच्यासह आयोगातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
पेपरफुटीच्या तक्रारीनंतर आयोगाने २२ मार्च २०२६ रोजी झालेली औषध निरीक्षक गट-ब पदाची चाळणी परीक्षा आणि त्यासंबंधित संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पदासाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांच्याकडून फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.






