Kalyan Accident : टिटवाळा: कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पुलावर आज सोमवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये इको टॅक्सी आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण दुर्घटनेत 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने मुरबाड परिसरातील रहिवाशांचा समावेश असून, हे सर्वजण कामानिमित्त कल्याणला आले होते आणि तिथून पुन्हा घराकडे परतत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रायते पुलावर सध्या एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे. पुलाचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी असते. सकाळी 10.45 च्या सुमारास कल्याणहून मुरबाडकडे जाणारी इको टॅक्सी आणि समोरून येणारा सिमेंट मिक्सर यांची धडक इतकी भीषण होती की टॅक्सीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसलेले होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अपघाताची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात मोठा संताप व्यक्त केला आहे. पुलाचे काम पूर्ण झालेले नसताना आणि सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून वाहतूक सुरू केल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बबलू चंदने, जिजा केंबरी, गणपत चंदे, अनंत पवार आणि भूषण घोरपडे यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
पोलिसांनी घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाच्या चुकीमुळे, याचा सविस्तर तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुरबाड तालुक्यावर शोककळा पसरली असून सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.







