मुंबई: छत्रपती संभाजीनगर छावणी येथील बालगृहात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांची सद्यस्थिती, आवश्यक सुधारणा व उपाययोजनांबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठकपार पडली.

या बैठकीस महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय, आमदार चित्रा वाघ, आमदार प्रज्ञा सातव, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, सहआयुक्त राहुल मोरे उपस्थित होते.
संस्थांच्या सर्वेक्षणासाठी प्रश्नावली निश्चित करणे, तपासणीसाठी भरारी पथके नियुक्त करणे व बालगृहातील मुलींचा त्यांच्या पार्श्वभूमी व आवडीनुसार बालगृहात सामावून घेण्याबाबत विचार करावा अशा डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत संबंधित विभागाला सूचना दिल्या. राज्यातील बालगृहांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित सुधारणा करणे, देखरेख यंत्रणा अधिक बळकट करणे, बालकांचे हक्क संरक्षित राहावेत यासाठी स्वतंत्र निरीक्षण समित्या स्थापन करणे, तसेच बालगृह व्यवस्थापनात पारदर्शकता वाढवण्याबाबत उपाययोजना करण्यावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.या महत्त्वपूर्ण चर्चेच्या अनुषंगाने लवकरच ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, असे मंत्री अदिती तटकरे यांनी आश्वस्त केले.







