मुंबई: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता (ICC Women’s World Cup 2025) ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील (Smriti Mandhana) सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थान येथे सत्कार केला. भारताला प्रथमच विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय हा क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.

यावेळी महाराष्ट्राच्या लेकी असलेल्या उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, राधा यादव यांना प्रत्येकी २ कोटी २५ लाख, तर प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना २२ लाख ५० हजार आणि सर्व सहकारी यांना प्रत्येकी ११ लाख रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करून मुख्यमंत्र्यांनी विजेत्या संघाचा सत्कार केला. गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी, पद्मश्री डायना एडल्जी, ॲनालिस्ट अनिरुद्ध देशपांडे, लॉजिस्टिक सपोर्ट अपर्णा गंभीरराव, ऑपरेशन मॅनेजर मारुफ फजानदार, मिहिर उपाध्याय, पूर्वा काटे, ममता शिरसुल्ला यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त शितल तेली, उपसचिव सुनील पांढरे उपस्थित होते.
“या विश्वविजयाने भारताचा गौरव वाढवला आहे. प्रत्येक खेळाडूने कुठल्या ना कुठल्या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. प्रशिक्षक आणि संपूर्ण संघाचे विशेष अभिनंदन करावे लागेल. स्मृती मानधना सध्या भारतातील आयकॉनिक खेळाडूंमध्ये गणली जाते. तिचा सुरुवातीपासून आजपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे. जेमिमाह रॉड्रिग्जनेही सेमीफायनलमध्ये अप्रतिम खेळी सादर केली. राधा यादवने संघर्षमय प्रवास करत आपले अस्तित्व निर्माण केले. प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी संघासाठी घेतलेली मेहनत आणि क्रिकेटमधील त्यांची कामगिरी प्रेरणादायी आहे.”
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस“महिला क्रिकेटच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे. पद्मश्री डायना एडल्जी यांनी लावलेले रोपटे आज मोठे झाले आहे. ग्रामीण भागातील मुलींना संधी मिळाली तर त्या जागतिक स्तरावर यश प्राप्त करू शकतात हे या क्रिकेट संघातील खेळाडूंनी सिद्ध केले आहे. या विजयाने क्रीडा रसिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, भविष्यातही आपण असेच यश प्राप्त कराल अशी अपेक्षा आहे.”
– उपमुख्यमंत्री अजित पवार







