मुंबई: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर (Devendra Fadanavis) देशात इंधनटंचाईची भीती निर्माण झाली असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Lockdown In India) नागरिकांना स्पष्ट शब्दांत दिलासा दिला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे सांगत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता वाढली आहे. भारत हा मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असल्याने या घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदीi यांनी देशाला आगामी आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले होते. “कोरोना काळात जशी एकजूट दाखवली, तशीच आता दाखवावी,” असे त्यांनी म्हटल्याने काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली.
या भीतीला सोशल मीडियावरून उधाण आले आणि अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढली. लोकांनी टाक्या फुल करण्यासाठी रांगा लावल्या, काही ठिकाणी किरकोळ गोंधळही झाला. मात्र, प्रशासनाच्या मते ही परिस्थिती वास्तविक टंचाईमुळे नसून अफवांमुळे निर्माण झालेली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सध्या भारताकडे सुमारे 1 महिन्याचा इंधनसाठा उपलब्ध आहे. तसेच, पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी 10 रुपयांनी कमी करण्यात आली असून वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा भार तेल कंपन्या आणि केंद्र सरकार स्वतः उचलत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येऊ नये, याची काळजी घेतली जात आहे.
त्यांनी नागरिकांना इशारा देत सांगितले की, घाबरून जास्त प्रमाणात इंधन खरेदी केल्यास कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ शकतो. “नेहमीप्रमाणेच इंधन भरावे, घाबरून साठेबाजी करू नये,” असे त्यांनी आवाहन केले. तसेच, लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट करत खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, काही शेजारी देशांमध्ये इंधन आणि गॅस तुटवड्यामुळे कार्यालये आणि संस्था बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र, भारताने नियोजनबद्ध धोरणामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठाही वाढवण्यात येत असून तो 20 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढला आहे आणि लवकरच 50 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सध्याच्या परिस्थितीत तेल कंपन्यांकडून पर्यायी पुरवठा साखळी सक्रिय करण्यात आली आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे एकाच स्रोतावर अवलंबून न राहता विविध देशांमधून कच्चे तेल आयात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे अचानक पुरवठा खंडित होण्याचा धोका कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच, रेल्वे, संरक्षण आणि आपत्कालीन सेवांसाठी इंधन राखीव ठेवण्याचीही तयारी करण्यात आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक संघर्ष लांबला तर इंधन दर, महागाई आणि वाहतूक खर्चावर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम शेतीपासून उद्योगांपर्यंत सर्व क्षेत्रांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवणे, अनावश्यक साठेबाजी टाळणे आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
एकंदरीत, सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी अफवा आणि घाबरून घेतलेले निर्णय परिस्थिती अधिक बिघडवू शकतात. त्यामुळे सरकारचा संदेश स्पष्ट आहे. इंधन पुरेसं आहे, घाबरू नका.







