उरुळी कांचन, ता. 27 : “प्रभू श्रीरामचंद्र की जय…” अशा जयघोषात आणि अलोट गर्दीत उरुळी कांचन पंचक्रोशीतील रामनवमी शोभायात्रा आणि श्रीराम पादुका दर्शन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. हजारो महिला, बालके आणि नागरिकांची उपस्थिती असूनही, कोठेही हुल्लडबाजी न होता अत्यंत शिस्तीत हा सोहळा पार पडल्याने उरुळी कांचनने जिल्ह्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
यंदाच्या शोभायात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रथमच सादर करण्यात आलेला ‘नरसिंह अवतार’ हा जिवंत देखावा. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच, मिरवणुकीत खास आकर्षण म्हणून सादर करण्यात आलेले ‘केरळ नृत्य’ सर्वांचे डोळे दिपवून टाकत होते. आकर्षक सजावट, डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई आणि ‘राजदत्त साऊंड अँड लाईट’च्या दर्जेदार सेवेने मिरवणुकीत रंगत भरली. सोहळ्याच्या शेवटी करण्यात आलेल्या भव्य फटाक्यांच्या आतिशबाजीने आकाश उजळून निघाले होते.
साधारणपणे मोठ्या मिरवणुकांमध्ये पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र, उरुळी कांचनमध्ये चित्र वेगळे होते. रस्ते भाविकांनी गच्च भरले असतानाही प्रत्येकाने आपल्या शिस्तीचे भान राखले. या संयमामुळे पोलीस प्रशासनाला कोणालाही शिस्त लावण्याची साधी वेळ आली नाही. अलोट गर्दी असूनही शांततेत पार पडलेला हा सोहळा उरुळी कांचनच्या सुजाण नागरिकत्वाचे दर्शन घडवून गेला.
या अभूतपूर्व नियोजनाचे खरे श्रेय पडद्यामागून काम करणाऱ्या तरुणांना जाते. स्वतःचे नाव कुठेही पुढे न येऊ देता, गेल्या अनेक वर्षांपासून हे तरुण अहोरात्र राबत आहेत. उत्सवाच्या नियोजनापासून ते खर्चापर्यंत आणि मिरवणुकीच्या शिस्तीपासून ते भाविकांच्या सोयीपर्यंत प्रत्येक गोष्टीत या ‘रामभक्तांच्या फौजेने’ स्वतःला झोकून दिले होते.
आदर्श सोहळ्याची पंचक्रोशीत चर्चा
आजच्या काळात जिथे लहान कार्यक्रमातही गोंधळ होतो, तिथे हजारो लोकांच्या उपस्थितीत अशा प्रकारे शिस्तबद्ध आणि भव्य शोभायात्रा निघणे, हे संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. उरुळी कांचनच्या या नियोजनबद्ध कार्यकर्त्यांचे आणि शिस्तप्रिय नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.







