भिवंडी : भिवंडी महानगरपालिका हद्दीतील नारपोली गंगाराम वाडी परिसरात गुरुवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. कोहिनूर अपार्टमेंट नावाची 4 मजली धोकादायक इमारत रात्री साडे 11 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचा आपत्कालीन विभाग, अग्निशमन दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य सुरू केल्यानंतर आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच इतर अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने बचाव पथकांना सुरुवातीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. घटनास्थळी जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी इमारतीच्या प्रवेशाजवळ असलेली जुनी चाळ जेसीबीच्या मदतीने हटवण्यात आली. त्यानंतर बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचू शकली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोहिनूर अपार्टमेंट ही इमारत 2007 मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये दोन विंग असून एकूण 30 खोल्या होत्या. मात्र, बांधकामातील त्रुटींमुळे ही इमारत काही काळापासून धोकादायक घोषित करण्यात आली होती.
इमारतीच्या एका भागातील तळमजल्यावरील काही पिलर खराब झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. सायंकाळपासूनच इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली होती. रात्री 8 वाजता इमारत झुकत असल्याचे लक्षात आल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून इमारत रिकामी केली होती. मात्र, त्यानंतरही काही लोक सामान घेण्यासाठी इमारतीत परत गेल्याची माहिती समोर आली आहे. याच काळात इमारत कोसळल्याने काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता निर्माण झाली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दुर्घटनेपूर्वी इमारतीच्या पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, 30 ते 40 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.







