भिवंडी: भिवंडी शहरातील (Bhivandi News) शांतीनगर परिसरात किरकोळ (Bhivandi Crime) वादातून झालेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. मित्रांनीच मित्राचा जीव घेतल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिशान अन्सारी (वय 25) या तरुणाची हत्या झाली असून, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिशान अन्सारी आणि त्याचे परिचित हसन मेहबुब शेख (22), मकबुल मेहबुब शेख (30) व हुसेन मेहबुब शेख (28) हे तिघे भाऊ एका गोदामात हमालीचे काम करीत होते. काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. तो वाद मिटल्याचे भासले असले तरी हसन व त्याच्या भावांनी मनात राग धरला होता. अखेर शनिवारी त्यांनी त्याचा सूड उगवला.

सायंकाळच्या सुमारास हसन, मकबुल, हुसेन यांच्यासह सुलताना मेहबुब शेख आणि आसमा वाजिद हे पाच जण जिशानच्या घरी पोहोचले. त्यांनी घरात घुसून जिशानच्या कुटुंबीयांवर शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचवेळी जिशान दुचाकीवरून घरी आला. तो वाहनावरून उतरताच हसनने त्याला जोरदार लाथ मारली. ती लाथ थेट वर्मी लागल्याने जिशान जमिनीवर कोसळला. गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला. प्रारंभी हा प्रकार वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा वाटला. मात्र प्राथमिक तपासात हल्ला नियोजित असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी हसन मेहबुब शेख, मकबुल मेहबुब शेख, हुसेन मेहबुब शेख, सुलताना मेहबुब शेख आणि आसमा वाजिद या पाच जणांविरुद्ध भादंवि कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
या घटनेमुळे शांतीनगर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. किरकोळ कारणावरून घडलेल्या या हत्याकांडामुळे स्थानिक नागरिकांत संताप असून, समाजातील तरुणवर्गाच्या वाढत्या आक्रमक वृत्तीबाबत चिंता व्यक्त होत आहे.







