पुणे: महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा निकाल गुरुवारी (२५ जून) लागणार आहे. राज्यातील न्यायालयीन इतिहासात अत्यंत जलदगतीने सुनावणी झालेला हा एक महत्त्वाचा खटला ठरला आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यांत या खटल्याचा निकाल येत आहे.

महाराष्ट्र दिनी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. या प्रकरणी ६५ वर्षीय भीमराव प्रभाकर कांबळे याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल आणि साक्षीदारांच्या आधारे केवळ 15 दिवसांत 1200 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात 21 मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झाली. प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने ही सुनावणी बंद दाराआड (इन-कॅमेरा) पार पडली. विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि त्यांचे सहकारी ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी पीडित बालिकेचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी, तपास अधिकारी आणि डीएनए विश्लेषक अशा एकूण 55 जणांच्या साक्षी नोंदवल्या. बचाव पक्षाकडून ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी, तर पीडित कुटुंबीयांकडून ॲड. राधिका नावंदर-जोशी आणि ॲड. मनीष पाडेकर यांनी काम पाहिले.
दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या खटल्याच्या जलदगतीने झालेल्या सुनावणीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष उद्या येणाऱ्या निकालाकडे लागले आहे. ही घटना घडल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती आणि नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून करण्यात आली होती.






