मुंबई: मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. हनीमूनदरम्यान पत्नीच्या मोबाईलवर सहकाऱ्यांनी पाठवलेले लग्नाच्या शुभेच्छांचे मेसेज पाहिल्यानंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली आणि रागाच्या भरात तिच्या गालाला चावा घेतल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका खासगी बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत असून तिचा विवाह 23 फेब्रुवारी 2025 रोजी झाला होता. लग्नानंतर मार्च 2025 मध्ये हे दाम्पत्य हनीमूनसाठी शिमल्याला गेले होते.

तक्रारीनुसार, शिमल्यात असताना पतीने पत्नीचा मोबाईल तपासला. त्यामध्ये कार्यालयातील सहकाऱ्यांनी पाठवलेले लग्नाच्या शुभेच्छांचे मेसेज पाहिल्यानंतर त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. यानंतर त्याने शिवीगाळ करत तिच्याशी वाद घातला आणि संतापाच्या भरात तिच्या उजव्या गालावर दाताने चावा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, शिमल्याहून परतल्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला. सासू, दीर आणि जाऊ यांनीही चारित्र्यावर संशय घेत तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप तिने केला आहे. मे 2025 मध्ये पुन्हा मारहाण झाल्यानंतर ती माहेरी निघून गेली.
यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी तिचे आई-वडील आणि नातेवाईक सासरी गेले असता त्यांच्याशीही गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने अखेर काळाचौकी पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी 27 जून 2026 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून पती फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे.







