मांडवगण फराटा: शेतीसाठी उसतोड मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत शेतकऱ्याकडून तब्बल १२ लाख ६७ हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी जालना जिल्ह्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सुधीर शिवाजी जाधव (वय ५०, रा.मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेषराव गोपीनाथ जाधव, कार्तिक शेषराव जाधव आणि सुंदर उत्तमराव जाधव (सर्व रा.वंजारवाडी, ता.बदनापूर, जि.जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार,सन २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठी आरोपींनी शेतासाठी उसतोड मजूर पुरविण्याचे आश्वासन दिले. तसेच पराग अॅग्रो फूड्स अँड अलाइड प्रॉडक्ट्स प्रा. लि.या साखर कारखान्याशी लेखी करार करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शेषराव जाधव यांनी १० लाख ६७ हजार रुपये, तर कार्तिक जाधव आणि सुंदर जाधव यांनी प्रत्येकी १ लाख रुपये अशी एकूण १२ लाख ६७ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर स्वीकारली.
मात्र, प्रत्यक्षात उसतोड मजूर उपलब्ध करून न देता आरोपींनी संगनमताने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार २४ जुलै २०२५ ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी २९ जून २०२६ रोजी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.






