पुणे: हिंदू पंचांगानुसार, यंदाचा पवित्र आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘अधिक मास’ (ज्याला ‘पुरुषोत्तम मास’, ‘धोंड्याचा महिना’असेही म्हणतात) सुरू झाला आहे. चंद्र वर्ष आणि सूर्य वर्ष यामधील ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना पंचांगात जोडला जातो, त्यालाच आपण अधिक मास म्हणतो. हा महिना भगवान श्रीविष्णूंना (पुरुषोत्तम) समर्पित असून या काळात केलेल्या भक्ती आणि साधनेचे फळ अनेक पटींनी मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मात्र, नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी आणि ईश्वरीय कृपा प्राप्त करण्यासाठी या महिन्यात काही विशिष्ट नियम पाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते. या पवित्र काळात नेमके काय करावे आणि कोणत्या गोष्टी करणे टाळावे, याविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

नक्की काय करावे?
अधिक मास हा भौतिक सुखांपेक्षा आत्मशुद्धी आणि पुण्य पदरात पाडून घेण्याचा काळ आहे. या काळात पुढील गोष्टी आवर्जून कराव्यात:

-
मंत्रजप आणि नामस्मरण: भगवान विष्णूंची उपासना करताना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ किंवा “श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी” या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा. यामुळे मनाला शांतता लाभते.
- धार्मिक ग्रंथांचे पठण: या संपूर्ण महिन्यात ‘श्रीमद् भागवत पुराण’ आणि ‘भगवद्गीते’चे (विशेषतः 15 वा अध्याय – पुरुषोत्तम योग) पठण किंवा श्रवण करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
- महादान आणि दीपदान: गरिबांना अन्नदान, वस्त्रदान, आणि धान्यदान करावे. तसेच संध्याकाळी घराबाहेर आणि तुळशीजवळ दीपदान (दिवा लावणे) करण्याचे विशेष महत्त्व आहे.
-
जावयाला वाण देणे (धोंडा वाण): महाराष्ट्रात या महिन्यात मुलीच्या आणि जावयाच्या सुख-समृद्धीसाठी त्यांना घरी बोलावून चांदीचे किंवा तांब्याचे भांडे, अनारसे आणि वाण देण्याची जुनी परंपरा आहे.
-
सत्कर्म आणि प्राणिसेवा: गाईला चारा किंवा अन्न देणे, गरजूंची सेवा करणे आणि तीर्थक्षेत्री किंवा घरीच गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्नान करणे लाभदायक ठरते.
काय करू नये?
ज्या कामांमुळे मनुष्यामध्ये अहंकार वाढतो, अशी सर्व कामे अधिक मासात निषिद्ध मानली गेली आहेत:
-
नवे शुभ कार्य (मंगल विधी): या महिन्यात विवाह (लग्न), साखरपुडा, मुंज (उपनयन), गृहप्रवेश आणि वास्तूशांती यांसारखे कोणतेही मोठे मांगलिक किंवा शुभ कार्य करू नये.
-
नवीन खरेदी आणि गुंतवणूक: नवीन घर, जमीन किंवा वाहने खरेदी करणे या काळात टाळावे. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन नोकरीत रुजू होण्यासाठी हा काळ योग्य मानला जात नाही.
-
तामसिक आहार: या संपूर्ण महिन्यात मांस, मद्य, कांदा आणि लसूण यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन पूर्णपणे वर्ज्य करावे. सात्विक जीवनशैलीचे पालन करावे.
-
मानसिक विकार आणि वाद: कोणत्याही व्यक्तीशी अनावश्यक वादविवाद घालणे, रागवणे, खोटे बोलणे किंवा कुणाचाही अपमान करणे टाळावे, कारण या काळात केलेल्या मानसिक पापांचे दुष्परिणाम जास्त होतात.
-
नवीन व्रतांची सुरुवात: एखादे नवीन व्रत किंवा उपवास या महिन्यात सुरू किंवा समाप्त (उद्यापन) करू नये, जुनी नित्य व्रते सुरू ठेवण्यास हरकत नसते.
33 या अंकाचे विशेष महत्त्व
अधिक मासात ’33’ या आकड्याला कमालीचे महत्त्व आहे. वाण देताना 33 अनारसे, 33 पुऱ्या किंवा 33 वस्तू दान केल्या जातात. हिंदू धर्मातील 33 कोटी (प्रकारच्या) देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ही 33 च्या संख्येने दान देण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. थोडक्यात सांगायचे तर, अधिक मास हा कोणत्याही भौतिक लाभासाठी धावपळ करण्याचा नसून, स्वतःच्या अंतर्मनात डोकावून ईश्वराशी जोडले जाण्याचा काळ आहे.







