पुणे : रक्षाबंधन सणाच्या तोंडावर खवड्या डोंगर घटनेतील कुणाल, त्याची आई संगीता आणि वडील मुरली काका यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंब दुःखाच्या सागरात बुडाले आहे. “या सणाला माझा भाऊ कुणाल माझ्यासोबत नाही, हे दुःख मी शब्दांत मांडू शकत नाही,” अशा अत्यंत भावुक शब्दांत कुणालच्या मावस बहिणीने आपली वेदना व्यक्त केली. या कठीण प्रसंगात सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांमुळे कुटुंबाला अधिकच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कुणालच्या मावस बहिणीने समोर येत माध्यमातून पसरणाऱ्या सर्व आरोपांचा स्पष्ट शब्दांत धिक्कार केला आहे. तिने असं सांगितलं आहे की, कुणालकडे स्वतःचा आयफोन 15 प्रो आधीपासूनच उपलब्ध होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याला लहानपणापासून कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती. त्यामुळे पैशांसाठी त्याने हे पाऊल उचलल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.जमिनीच्या वाटणीवरून किंवा बहिणीच्या नावावर जमीन केल्यामुळे कुणाल नैराश्यात होता, हा आत्याने केलेला आरोप तिने पूर्णपणे फेटाळून लावला.

कुणालला कोणतीही मालमत्ता किंवा संपत्ती नको होती, तर त्याला फक्त आपले वडील सोबत हवे होते. गेल्या 20 वर्षांत ज्या आत्याने कधी विचारपूस केली नाही, ती अचानक जवळ आली आणि मुरली काकांना कुटुंबापासून दूर नेऊ लागली. मुरली काका स्वभावाने अत्यंत निर्मळ आणि साधे असल्याने कोणावरही सहज विश्वास ठेवायचे. याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन वडिलांना आपल्यापासून दुरावले जात असल्याची भीती कुणाल आणि त्याच्या आईला सतावत होती.

“आम्ही आमचा भाऊ, मावशी आणि काका अशा तिघांनाही गमावले आहे. हे दुःख सहन करणे आधीच कठीण असताना, ज्या गोष्टी मृत व्यक्तींनी कधी केल्याच नाहीत, त्या त्यांच्याशी जोडून त्यांची बदनामी करू नका,” असे आवाहन बहिणीने केले आहे. सणाच्या काळात दुःखात असलेल्या या कुटुंबाबाबत कोणतीही अपुरी माहिती न पसरवण्याची आग्रही विनंती केली आहे.






