पुणे : पुणे शहरात वारंवार होणाऱ्या अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीसाठी कोणत्याही धरणातील, तलावातील पाणी आरक्षित नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे.
पीएमआरडीएची स्थापना ३१ मार्च २०१५ रोजी झाली असून, त्यांच्या अखत्यारित ६०५१.६२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. नऊ तालुक्यांत विस्तारलेल्या पीएमआरडीएमध्ये ६९७ गावांचा समावेश आहे. २०११ मधील जनगणनेनुसार ७३ लाख २१ हजार ३६७ इतकी लोकसंख्या आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, एमआयडीसी, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्यासाठी वेगवेगळ्या धरणांमधून पाणीपुरवठा होत आहे. मात्र, या नागरिकांसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
दरम्यान महापालिका हद्दीलगत तसेच शहरांलगत पीएमआरडीए हद्दीत रहिवासी प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले जात आहेत. मात्र हद्दीलगतच्या प्रकल्पांसाठी दोन टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे . पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पीएमआरडीएकडे सध्या कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.