पुणे : ओडिशामधील पुरी येथील जगप्रसिद्ध रथयात्रेत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भगवान जगन्नाथ यांच्या या वार्षिक उत्सवादरम्यान झालेल्या प्रचंड गर्दीमुळे अचानक चेंगराचेंगरी झाली. या भीषण अपघातात 1 भाविकाला आपला जीव गमवावा लागला असून, जवळपास 200 भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरी येथील प्रसिद्ध ग्रँड रोडवर ही दुर्घटना घडली. या रस्त्यावरील मार्केट चौक आणि मिरची कोर्ट चौक या दोन ठिकाणांच्या दरम्यान भाविकांची अथांग गर्दी जमली होती. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना मंदिरातून बाहेर आणण्याची पारंपारिक आणि पवित्र अशी ‘पहंडी’ विधी सुरू होती. देवतेचे दर्शन घेण्यासाठी आणि रथाचे दोर ओढण्यासाठी लाखो भाविक एकाच वेळी पुढे सरसावले.

या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी देशभरातून आलेले श्रद्धाळू मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. मात्र, ‘पहंडी’ विधीदरम्यान लोकांमध्ये अचानक धावपळ आणि प्रचंड गोंधळ निर्माण झाला. गर्दीचे नियंत्रण सुटल्यामुळे लोक एकमेकांवर पडले आणि त्याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. या गोंधळात अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर काहींना गंभीर दुखापत झाली.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या 200 हून अधिक लोकांना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय पथकांकडून उपचार सुरू आहेत. प्रशासनाने तातडीने पावले उचलत घटनास्थळी धाव घेतली असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तसेच, सुरक्षेचे उपाय आणखी कडक करण्यात आले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे देशभरातील जगन्नाथ भक्तांमध्ये आणि रथयात्रेत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.







