आदित्य बोराटे

इंदापूर: पळसदेव (ता. इंदापूर) येथील इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे तत्कालीन अध्यक्ष तसेच पळसनाथ शिक्षणसंस्थेचे संस्थापक प्रकाश भगवानराव काळे यांच्या हत्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी संदीपान विष्णू पोटे (वय ७६, रा. पळसदेव, ता. इंदापूर) याला जन्मठेपेची शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम मृत प्रकाश काळे यांच्या वारसांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले असून, दंड न भरल्यास आरोपीला एक वर्षांची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे.हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी दिला.

न्यायालयीन निवेदनानुसार, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पळसदेव येथील मेन रोडवर ही घटना घडली होती. प्रकाश काळे हे संजय मेडिकलसमोरील कट्ट्यावर बसले असताना जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी संदीपान पोटे तेथे आला. त्याने तलवारीने प्रकाश काळे यांच्या डोक्यावर, तोंडावर, गळ्यावर व मानेवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रकाश काळे यांना प्रथम इंदापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अकलूज येथे उपचारासाठी हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला; मात्र उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी विक्रमसिंह विजयकुमार काळे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. आर. व्ही. गोमारे यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जी. जोशी यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी ११ साक्षीदारांची साक्ष, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर सादर केले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावत ही रक्कम मृत प्रकाश काळे यांच्या वारसांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.
या खटल्याच्या कामकाजात इंदापूर न्यायालयातील पैरवी अधिकारी पी.एस.आ गोरख कसपटे तसेच महिला पोलिस हवालदार स्मिता पारेकर यांनी सहकार्य केले.
गेल्या सात वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेल्या या गाजलेल्या हत्याकांडाचा अखेर निकाल लागल्याने तालुक्यात या निर्णयाची चर्चा सुरू असून, प्रत्यक्षदर्शी साक्षी आणि भक्कम परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दिलेला हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.







