IndiGo Flight : इंडिगो एअरलाईन्सचा गोंधळ अजूनही थांबायचं नाव घेत नाही. तब्बल सहा दिवसांपासून सुरू असलेलं हे सगळं प्रकरण लोकांसाठी त्रास दायक ठरलं आहे. विमानतळावर सकाळपासून प्रवाशांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. कंपनीला इतका आधी इशारा मिळूनही त्यांनी ड्युटी-टाईमच्या नियमांवर योग्य वेळी काम केलं नाही, आणि त्याची थेट किंमत प्रवाशांना चुकवावी लागली. त्यात कंपनीची प्रतिष्ठाही धुळीस मिळाली. या गोंधळानंतर शेवटी सरकारला जाग आली आणि घाईघाईत इंडिगोला नोटीस देण्यात आली. पण ”नोटीस पुरेशी नाही, कडक कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी प्रवाश्याकडून होतं आहे. (IndiGo Flight)

दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या प्रकरणावर कडाडून प्रतिक्रिया दिली. चुकीला माफी नाही, कठोर कारवाई होणारच. असा इशारा मुरलीधर मोहोळ यांनी दिला.
प्रवाशांचा संताप उफाळून आला
इंडिगोच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे प्रवाशांचं बोंबलं झालं. पायलट संघटनेने आधीच मागणी केली होती की ड्युटीचे तास कमी करावेत. DGCA नेही त्यावर आदेश दिले. इतर विमान कंपन्यांनी ते ताबडतोब लागूही केले. दोन टप्प्यांत बदल करायचे ठरले होते. पण इंडिगो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झोपेतच होती, असं मोहोळ यांनी स्पष्ट सांगितलं. ”या गोंधळाला इंडिगो एकटं जबाबदार,” असं त्यांनी ठामपणे म्हटलं.
नक्की गोंधळ झाला तरी कसा?
कामाचे तास अचानक १० वरून ८ झाले. या दोन तासांच्या फरकामुळे पायलट आणि कर्मचार्यांची मोठी कमतरता निर्माण झाली. १ नोव्हेंबरपासूनच इंडिगोवर हा ताण वाढत गेला आणि शेवटी त्यांची संपूर्ण सिस्टीमच कोसळली. नागरी उड्डाण मंत्रालयाने याची दखल घेतली असून, तात्पुरते नियम लागू करून फेब्रुवारीपर्यंत सिस्टीमला स्थगिती देण्यात आली आहे.
4 सदस्यीय चौकशी समिती
DGCA ने या प्रकरणात चार सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे. प्रवाशांसाठी कंट्रोल रूमही स्थापन केली आहे. इंडिगोला नोटीस बजावली असून- ”कुठलीही चूक माफ केली जाणार नाही. जे आवश्यक असेल ते करू,” असा इशारा मोहोळ यांनी दिला.
तिकीट दरांवरही घातली लगाम
इंडिगोचं ऑपरेशन विस्कळीत होताच इतर विमान कंपन्यांनी तिकीटदर आकाशाला टेकवले. अक्षरशः लूट चालली होती. सरकारने याची दखल घेत तात्काळ तिकीट दर नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले. रद्द झालेल्या फ्लाइट्सचे संपूर्ण पैसे परत द्यावेत, अशीही कडक सूचना देण्यात आली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील मोठी कारवाई होणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.






