पुणे : पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान होणारें ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक कोंडीविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. हल्ल्याने आपला निर्धार अजिबात डगमगणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आपला लढा असाच सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

विद्यानंद बापट यांनी असे म्हटले आहे की,मारहाण करणाऱ्यांची कृती ही निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली स्टंटबाजी आहे. विचारांची लढाई ही हिंसेने नाही, तर विचारांनीच लढली पाहिजे.गणेशोत्सवाला 132 वर्षांची परंपरा असली, तरी काळानुसार त्यात योग्य बदल होणे गरजेचे आहे. सणांचा आनंद घेताना सामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये.तसेच डीजे आणि ध्वनिवर्धकांचे कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी आयोजित केले जावेत. जर मिरवणुका काढायच्या असतील, तर शहराबाहेरील मोठ्या रस्त्यांवर एका स्वतंत्र लेनमध्ये त्या काढल्या जाऊ शकतात असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, रविवारी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात ते नक्की सहभागी होणार आहेत. परिस्थिती कशीही असली तरी भीती न बाळगता नागरिकांच्या या चळवळीत ते ठामपणे उभे राहतील. या लढ्याला अधिक प्रभावी करण्यासाठी आगामी काळात एका संघटनेचे रूप देण्याचा त्यांचा विचार सुरू आहे.

पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात उत्सवाच्या नावाखाली धुडघूस घालणे योग्य नाही, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. कोणत्याही धार्मिक भावनांना विरोध नसून, केवळ सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास आणि आवाजाची मर्यादा ओलांडण्याला आपला विरोध असल्याचे शेवटी बापट यांनी स्पष्ट केले.







