पुणे : अंमली पदार्थ, गुटखा, तंबाखू, सिगारेट आणि मद्याच्या विळख्यात अडकणाऱ्या युवकांना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी आता केवळ कारवाईवर भर न देता जनजागृती, समुपदेशन आणि पुनर्वसनाचा त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. ‘अंमली पदार्थांना NO म्हणण्याचे धाडस’ या घोषवाक्याखाली पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने सोमवारी (ता. 10) व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अभियानात व्यसनाधीन व्यक्ती, अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात आले. व्यसनाधीन व्यक्तींना केवळ गुन्हेगार म्हणून न पाहता समुपदेशन, पुनर्वसन आणि रोजगाराच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येणार आहे.

अवैध धंदे सोडा; रोजगाराची संधी मिळवून देणार!

अंमली पदार्थ, गुटखा, तंबाखू, सिगारेट आणि मद्याची विक्री केल्याप्रकरणी वारंवार गुन्हे दाखल होऊनही काहीजण पुन्हा त्याच व्यवसायाकडे वळतात. अशा व्यक्तींना या अवैध व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक मार्गदर्शन देण्याचा आराखडा तयार केला जाणार आहे. एनजीओच्या माध्यमातून अशा व्यक्तींचे समुपदेशन करून त्यांना नवीन व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच काहींना रोजगार मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले.
शाळा-महाविद्यालयांमध्ये ड्रग्ज, सायबर क्राईम अन् महिला सुरक्षेची जनजागृती
१५ ऑगस्टपर्यंत कोल्हापूर परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ड्रग्ज, सायबर क्राईम, वाहतूक नियम आणि महिला अत्याचाराबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात लाईव्ह कार्यक्रम घेऊन या अभियानाला आणखी व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे, यासाठी विशेष प्रबोधन करण्यात येणार आहे.
‘व्यसनाधीन व्यक्तीला दोष देऊ नका; त्याला पुन्हा उभे करा!’
व्यसनामुळे केवळ व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्यच धोक्यात येत नाही, तर कौटुंबिक कलह, आर्थिक नुकसान, सामाजिक समस्या आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीला केवळ दोष देण्याऐवजी समुपदेशन व पुनर्वसनाच्या माध्यमातून त्याला व्यसनमुक्त जीवनाकडे वळविणे आवश्यक आहे, असा संदेश अभियानातून देण्यात आला.
पालक, शिक्षक, सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि नागरिकांनीही या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या परिसरात व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी केले. ‘व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार’ आणि ‘व्यसनमुक्त कुटुंब, सुरक्षित समाज’ या उद्देशाने पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या या अभियानामुळे पोलिसांच्या कारवाईसोबतच पुनर्वसनाच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
या अभियानात पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पोलिस उपअधीक्षक अविनाश शिळीमकर यांच्यासह आरोग्य विभाग, विविध व्यसनमुक्ती केंद्रे, सामाजिक संस्था, एनजीओ, विधी सल्लागार आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.







