उरुळी कांचन : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य नेते आणि आपल्या शाहिरीतून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उरुळी कांचन येथील गोळे वस्ती परिसरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन युवा गर्जना प्रतिष्ठान आणि झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाली. यावेळी परिसरातील नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून आणि शाहिरीतून शोषित, वंचित व कष्टकरी वर्गाचे वास्तव जगासमोर मांडले. त्यांच्या या उत्तुंग योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी भाषणातून करण्यात आली.

तसेच युवा गर्जना प्रतिष्ठान व झोपडपट्टी सुरक्षा दलाने एकत्र येऊन असा स्तुत्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक व अभिनंदन केले. यावेळी माजी सरपंच संतोष कांचन, शिवसेना नेते अलंकार कांचन, योगेश कांचन, सुभाष बगाडे, प्रसाद कांचन, संतोष गायकवाड, अशोक चव्हाण, गोविंदा चव्हाण, सारिका लोणारी, रामदास टिळेकर, राजु अढागळे, सुभाष टिळेकर यांच्यासह परिसरातील अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत आणि उपस्थितांचे आभार आबासाहेब चव्हाण यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा गर्जना प्रतिष्ठान व झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.







