पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर येथे अंत्यसंस्कारादरम्यान मधमाशांच्या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अनेक नातेवाईक आणि उपस्थित नागरिकांना मधमाशांनी दंश केला असून त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्यविधी सुरू असतानाच परिसरातील मधमाशांचे मोहोळ अचानक उठले आणि उपस्थितांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्मशानभूमीत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मधमाशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सैरावैरा पळ काढला. परिस्थिती इतकी गंभीर होती की, काही काळासाठी अंत्यविधी थांबवून पार्थिव जागेवरच ठेवावे लागले. उपस्थितांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
या हल्ल्यात अनेकांना मधमाशांनी दंश केल्याने त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या अनपेक्षित घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, स्मशानभूमी परिसरात मधमाशांचे मोहोळ असल्यास त्याबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.






