नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत गांजाची विक्री आणि पुरवठा करणाऱ्या प्रेमी युगुलाला अटक केली आहे. या कारवाईत 29 ग्रॅम गांजासह चार मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींसह आणखी चार जण फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळोजा परिसरातील ओम साई रेसिडेन्सी लॉजवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पनवेल तालुक्यातील कोठारी गावातील वैभव वासुदेव म्हात्रे (वय 25) आणि चंदीगड येथील करिष्मा प्रेम खडक (वय 22) यांना ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत दोघेही गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंधात असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या ताब्यातून 29 ग्रॅम गांजा, चार मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांच्या तपासात अमली पदार्थांच्या पुरवठ्यासाठी एका मोठ्या साखळीचे अस्तित्व असल्याची माहिती आरोपींकडून मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात भरत नेपाळी आणि अमित भोईर हे मुख्य फरार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच अमित भोईरचे आणखी दोन साथीदारही फरार असून त्यांचाही शोध सुरू आहे. सर्व आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि त्यामागील संपूर्ण नेटवर्क काय आहे, याचा तपास तळोजा पोलीस करत आहेत.






