लोणी काळभोर (पुणे) : मागील दोन दिवसापासून पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होऊन शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे हवेली तालुका तलाठी संघाच्या वतीने १७ ऑक्टोंबरपासून कामबंद केले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान तपासण्याची आणि पंचनामे करण्याची जबाबदारी ज्या तलाठ्यांची असते. तेच तलाठी अशा आणीबाणीच्या काळात थेट संपावर गेले आहेत. त्यामुळे गावच्या तलाठ्यांना शेतकऱ्यांपेक्षा संप महत्त्वाचा वाटतोय असेच म्हणावे लागेल. सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृष्य मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर व्हावी यासाठी शेतकरी तहसील कार्यालयाच्या चकरा मारताहेत. पण तिथं गेल्यावर कळतं की तलाठी महोदय हे संपावर गेले आहेत. महसूल यंत्रणेतील तलाठी हा महत्त्वाचा दुवा आहे. गावोगावच्या गावनोंदीपासून तर सात-बारा उतार्यापासून इतरही महत्त्वाच्या कामांसाठी तलाठी घटक कार्यरत असतो. गेल्या आठवड्यापासून राज्यात तलाठी आणि मंडलाधिकारी आंदोलनावर आहेत.
पिकांत पाणी साचल्याने शेतजमीनी नापीक होण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. भाजीपाल्यांचेही पाणी साचल्याने नुकसान झाले. पिकांमध्ये पाणी साचल्याने कोबी, मिरची, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर,मोसंबी आदी पिके सडू लागली आहेत. विहीरी तुडुंब भरल्याने त्या शेतातच पाणावल्या जाऊन जमिनीतुन पाणी बाहेर झिरपत आहे. तर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले असल्याने पिके पाण्याखाली आहेत.
याबाबत कुंजीरवाडी येथील प्रगतशील शेतकरी सचिन तुपे म्हणाले, या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवस पडलेल्या प्रचंड पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दोन एकर क्षेत्रातील द्यायला आलेली कोथिंबीर हि पावसामुळे जागेवर सडून गेली. तसेच दीड एकर बाजरी व उसाचे पिक पाण्यावर पोहत आहे. हि पूरस्थिती ओढयातील अतिक्रमणामुळे झाली आहे. तरी, संबंधित अधिकाऱ्यांनी केसनंद डोगरावरून येणाऱ्या मुळा मुठा नदीकडे येणारा ओढा नकाशाप्रमाणे करावा. व अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करून अतिक्रमण हटवावे.