सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पुन्हा एकदा पेटू लागला आहे. आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी नेते समाधान फाटे यांची तब्येत सहाव्या दिवशी खालावली आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी नेते आणि कार्यकर्ते पंढरपूरकडे रवाना झाले असून आंदोलन (Solapur Farmers Protest) अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसुन येत आहेत.

सहाव्या दिवशी फाटे यांची प्रकृती गंभीर
ऊसाला साडेतीन हजार रुपये पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी समाधान फाटे यांच्यासह त्यांचे तीन सहकारी गेले सहा दिवस वाखरी पालखी तळावर आमरण उपोषणाला बसले आहेत. सहाव्या दिवशी फाटे यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांनी आजपासून वैद्यकीय उपचार घेणेही थांबवले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू ठेवू न देण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
सोलापूरातील ऊस सातारा, पुणे जिल्ह्यांत
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील ऊस शेजारच्या सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर तसेच पुणे जिल्ह्यातील निरा-भीमा परिसरातील साखर कारखान्यांकडे वळू लागला आहे. त्या ठिकाणी ऊसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सीताराम आणि पांडुरंग सहकारी साखर कारखाने बंद पाडले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन दोन्ही कारखान्यांनी पहिली उचल वाढवून तीन हजार रुपये जाहीर केले आहेत.
तसेच आंदोलनाचा फटका बसू नये म्हणून बबनराव शिंदे यांनी त्यांच्या दोन्ही कारखान्यांवर, तर आमदार अभिजीत पाटील यांनी त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर तातडीने तीन हजार रुपयांपेक्षा जास्त पहिली उचल जाहीर केल्याची माहिती मिळत आहे. आंदोलन पुढील काही तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






