पुणे : आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शाळांमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय तुम्ही घेतला असाल तर या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राचा इतिहास असणार काय?मराठी किती टक्के असणार?महाराष्ट्राची किती माहिती त्यात असणार आहे. सीबीएसईतून शिक्षण दिल्यावर मग मराठी भाषेचे काय होणार याबद्दल मला चिंता आहे. राज्य शिक्षण मंडळ तुम्ही बंद करणार आहात का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करत असताना आपण मराठी साहित्य, कला, संस्कृती , इतिहास यावर घाला घालत आहोत,अस आपणास वाटत नाही का?, एकीकडे शिक्षक आत्महत्या करतायत, शाळांना इमारती नाहीत, पट संख्या, वेळापत्रक, शाळेला वीज नाही, पाणी नाही, इतर अनुदानाचा प्रश्न इत्यादी तातडीचे प्रश्न समोर असताना सीबीएसई पॅटर्न राबवणे कितपत योग्य आहे? असा सवालच सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे







