पुणे: ग्रामीण भागात शेतजमिनीच्या ताबा आणि (Salokha Yojana Maharashtra) वहिवाटीवरून वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने ‘सलोखा योजना’ला मुदतवाढ (Land possession dispute solution) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेची वैधता आता जानेवारी 2027 पर्यंत वाढवण्यात आली असून, त्यामुळे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. न्यायालयात न जाता परस्पर संमतीने जमिनीचे वाद मिटवण्याची सुवर्णसंधी या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे.

ग्रामीण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जमिनी एका व्यक्तीच्या नावावर असतात, मात्र प्रत्यक्ष ताबा दुसऱ्याच शेतकऱ्याकडे असतो. अशा ताबा-वहिवाटीच्या वादांमुळे शेतीची कामे खोळंबतात, कौटुंबिक तणाव निर्माण होतो आणि प्रकरणे वर्षानुवर्षे न्यायालयात अडकून राहतात. वेळ, पैसा आणि मानसिक त्रास याचा फटका थेट शेतकऱ्यांनाच बसतो.
याच पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ‘सलोखा योजना’ ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक ठरत आहे. ज्या प्रकरणांत एका शेतकऱ्याच्या नावावरील जमीन दुसऱ्याच्या ताब्यात आहे आणि दोघांचीही संमती आहे, अशा जमिनींची कायदेशीर अदलाबदल या योजनेअंतर्गत करता येते. विशेष बाब म्हणजे या अदलाबदलीसाठी केवळ 2,000 रुपये खर्च येतो. 1,000 रुपये नोंदणी शुल्क आणि 1,000 रुपये मुद्रांक शुल्क एवढ्याच रकमेवर नोंदणीकृत व्यवहार पूर्ण करता येतो. अन्यथा बाजारमूल्यानुसार लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली असती.
या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे प्रकरण थेट तहसील कार्यालयात निकाली काढता येते. वकिलांची फी, तारखांवरील धावपळ आणि वर्षानुवर्षांचा विलंब टळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा संबंधित जमिनीवर किमान 12 वर्षांपासून प्रत्यक्ष ताबा असणे आवश्यक आहे. ही योजना केवळ शेतजमिनीसाठी लागू असून, दोन्ही शेतकऱ्यांची लेखी संमती बंधनकारक आहे.
जमिनीच्या वादांमुळे अनेकदा गावागावांत भांडणे, तणाव आणि हिंसक घटना घडतात. ‘सलोखा योजना’मुळे परस्पर संमतीने वाद मिटत असल्याने ग्रामीण भागात सामाजिक सलोखा आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे. 2027 पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, नांदेड जिल्हा प्रशासनाने पात्र शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. वादमुक्त आणि सुरक्षित शेतीकडे जाण्याचा हा महत्त्वाचा मार्ग ठरत आहे.







