पुणे, ता. 6 : हडपसर (पुणे) येथील समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक प्रशांत गवळी व त्याचे 7 संचालक हे फोन बंद करून फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मागील पाच महिन्यांपासून परतावा तर सोडाच पण मुद्दलही न मिळाल्याने गुंतवणूकदारांचा सहनशक्तीचा बांध फुटला आहे. संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी समर्थ क्रॉप केअरचे हडपसर येथील कार्यालय शुक्रवारी (ता.5) फोडले आहे. ”पुणे प्राईम न्यूज”ने हा घोटाळा उघडकीस आणून खूप मोठे यश संपादन केले आहे. वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून हजारो नागरिकांना भविष्यात होणाऱ्या फसवणूकीपासून वाचवले आहे.

संस्थाचालक प्रशांत गवळी व त्याचे संचालक सुदामा दास, प्रकाश मांगने, नागनाथ जाधव, प्रकाश राठोड, ज्योतिबा काटकर, ओंकार कदम व चंद्रकांत राऊत हे सर्वजन आर्थिक घोटाळा करून फरार झाले आहेत. संस्थाचालक प्रशांत गवळी व संचालकांशी सद्या कसलाही संपर्क होत नाही. त्यामुळे पुण्यासह राज्यातील 12 हून अधिक जिल्ह्यातील 45 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांना सर्व संचालकांनी 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. गुंतवणूकदार पुढील दोन दिवसात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहेत. त्यामुळे राज्यातील हा एक मोठा आर्थिक घोटाळा असणार आहे.
समर्थ क्रॉप केअरने शेतमाल एक्सपोर्ट करण्याच्या नावाखाली पुण्यासह राज्यातील 12 हून अधिक जिल्ह्यातील गुंतवणूक दारांना समर्थ क्रॉप केअरने प्रतिमाह 10 टक्के परताव्याचे आमिष दाखविले होते. या फसव्या योजनेच्या माध्यमातून 45 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांकडून 4 ते 5 हजार कोटी रुपयांहून अधिक माया गोळा केली आहे. प्रशांत गवळी याच्याकडे एवढी कोट्यावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा असतानादेखील गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक कुठल्या कंपनीमध्ये आहे. याची काडीमात्रसुद्धा त्यांना कल्पना नाही.
”पुणे प्राईम न्यूज”ने समर्थ क्रॉप केअरचा भांडाफोड केल्याने गुंतवणूकदारांनी या फसव्या योजनेत पैसे टाकणे बंद केले. त्यामुळे प्रशांत गवळीने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी चौफुला (ता.दौंड) येथील स्वराज्य मंगल कार्यालयात मेळावा घेतला. यावेळी गवळी म्हणाला की, सध्या आर्थिक अडचणी आल्या आहेत. पण त्या तापुरत्या आहेत. कंपनी सर्व गुंतवणूकदारांना न्याय देणार आहे. कोणाचाही पैसा बुडविणार नाही. फक्त मला थोडा अवधी द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे मी कुठेही असलो तरी तुमच्या खात्यात पैसे येतील. तेव्हा सध्याची वेळ मारून नेल्यासाठी गुंतवणूकदारांना 3 टक्के परतावा देण्याचे नवीन गाजर दाखवले होते. तसेच 1 डिसेंबरला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते.
मागील पाच महिन्यांपासून गुंतवणूकदारांना एक दमडीही परतावा दिलेला नाही. संस्थेची सर्व आर्थिक गणिते कोलमडल्याने संस्थाचालक प्रशांत गवळी हा गुंतवणूकदारांना फक्त ‘तारिख पे तारिख देत होता. जोपर्यंत भांडवल येण्याचा वेग जास्त होता. तो पर्यंत समर्थ क्रॉप केअरने गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे. परंतु, या योजनेत परतावा देण्याचा वेग जास्त झाल्याने त्यांना परतावा देण्याचे शक्य नव्हते. त्यामुळे ही योजना पाचमहिन्यापूर्वीच बंद पडली होती. इथून मागच्या फसव्या योजनांचा अनुभव पाहता, एकाही कंपनीने कुठल्याच गुंतवणूकदारांचे परतावा सोडा मूळ मुद्दलही परत केलेली नाही. त्यामुळे प्रशांत गवळी व त्याचे 7 भागीदार गुंतवणूकदारांना केवळ पुढील तारखा देऊन गाशा गुंडाळून पळून जाण्याच्या तयारीत होते. तर गुंतवणूकदार आज नाहीतर उद्या पैसे मिळतील? अशी आस लावून बसले होते. परंतु, तेवढ्या काळातच प्रशांत गवळी हे संचालकांसह फरार झाला आहे.
दरम्यान, या प्रकारच्या फसव्या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना मूळ मुद्दल मिळण्याची कधीच “शाश्वती” नसते. कारण या योजनेचा मूळ हेतू साखळीपद्धतीने पैसे गोळा करणे, सुरवातीला काही महिने परताव्याचे आमिष दिले जाते. परंतु, साधारणता 19 ते 20 महिने हे ठग पैसे गोळा करण्यासाठी नाना क्लुप्त्या वापरतात. ठराविक वेळेनंतर गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आणि परताव्याचा वेग वाढला की, ठराविक रक्कम जमा झाल्याची खात्री पटल्यानंतर हे ठग गाशा गुंडाळून परदेशात पोबारा करतात. हा इथून मागच्या सर्व प्रकरणांचा इतिहास आहे.
हडपसर येथील समर्थ क्रॉप केअरचे कार्यालय फोडले
सध्याच्या एकंदरीत परिस्थितीवरून परतावा तर सोडा मूळ मुद्दलही मिळणे कठीण झाल्याचे गुंतवणूकदारांना दिसून आले आहे. त्यामुळे त्यांनी हडपसर येथील समर्थ क्रॉप केअरचे कार्यालय गाठले. परंतु, त्यांना तेथेही कोणीच आढळून आलेले नाही. तसेच सर्वांचे फोनही बंद झाले आहेत. त्यामुळे आपले पैसे बुडाल्याच्या रागातून संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी हडपसर येथील समर्थ क्रॉप केअरचे कार्यालय फोडले आहे.
गुंतवणूकदारांना कपाळावर हात मारण्याची आली वेळ ?
मागील पाच महिन्यांपासून समर्थ क्रॉप केअरने कुठल्याही गुंतवणूकदाराला एक छदामही परतावा दिला नाही. पुणे प्राईम न्यूजने भविष्यातील धोके ओळखून गुंतवणूकदारांना जागरूक करण्याचे प्रयत्न केले. हा ठग कोणत्याही गुंतवणूकदारांना एक दमडीही देणार नाही. गवळी आणि त्याचे साथीदार परदेशात फरार होण्याअगोदर गुंतवणूकदरांनो, तुम्ही तुमच्या पद्धतीने मूळ मुद्दल काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. असे सांगितले होते. परंतु, हे सर्व ठग फरार झाल्याने सर्व गुंतवणूकदारांना आता कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे.






