Pune News नसरापूर, ता. ५ : नसरापूर (ता. भोर) येथे घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निरपराध चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने गावात शोककळा आणि संतापाची लाट उसळली आहे. “मानवतेलाच काळिमा फासणारी” अशी ही घटना असल्याची भावना संतप्त ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. Pune News

१ मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर नसरापूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्र येत राज्य सरकारकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात आरोपीला फाशीची शिक्षा, प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणे, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व आईला शासकीय नोकरी देणे, तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
“आमच्या गावात घडलेली ही घटना अत्यंत भीषण आहे. अशा विकृत प्रवृत्तीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावात ठिकठिकाणी बैठका घेऊन न्यायासाठी लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात सरकार अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट करत आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सुटू दिले जाणार नाही, असे आश्वासन दिले. न्यायवैद्यक व तांत्रिक पुरावे गोळा करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रकरणाची सुनावणी जलद गतीने होण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाबाबतही सरकार प्रयत्नशील आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. महिला सुरक्षेसाठी कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.
या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ग्रामस्थांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
“न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” — नसरापूर ग्रामस्थांचा निर्धार
ही घटना केवळ एका कुटुंबावर आलेले दु:ख नसून संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता प्रशासन कितपत जलद आणि कठोर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






