पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा रस्ता करण्यास परवानगी दिल्याने आता महापालिकेकडून रस्ता तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी पुणे महापालिकेला आता वनविभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी अर्ज केला जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सेनापती बापट रस्त्यांसह इतर महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बालभारती ते पौड फाटा हा रस्ता प्रस्तावित आहे. हा रस्ता वेताळ टेकडीवरून जातो. या रस्त्याच्या कामाला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. त्यामुळे या रस्त्याचे काम दीड वर्षापेक्षा अधिक वर्षापासून बंद ठेवण्यात आले आहे. या कामाच्या विरोधात नागरी चेतना मंचाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे रस्ता करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबतच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय देत रस्ता करण्यास परवानगी दिली आहे. मात्र हा रस्ता तयार करण्यापूर्वी पर्यावरण विभाग आणि वनविभागाच्या कोणत्याही परवानगीची गरज आहे का? हे महापालिकेने तपासावे असेही यावेळी नमूद केले आहे.त्यामुळे न्यायालयाच्या सूचनेनुसार या रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी वन विभागाची मान्यता घेण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. यासाठी वन खात्याला पत्र दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.






